नियम पाळतेय तरी कोण?सरकारी बाबूंना ओळखपत्राचे वावडेच..!
खामगाव शहरासह ग्रामीण भागातही नियमाची पायमल्ली
खामगाव:- (अजयसिंह राजपूत) नियम पाळतेय तरी कोण,असे म्हणणे वावगे ठरणार नाही.शासकीय कर्मचाऱ्यांनी कामावर येताना ओळखपत्र घालून येणे बंधनकारक आहे.मात्र,बहुतांश कर्मचारी ओळखपत्र घालून येत नसल्याचे चित्र खामगाव तालुक्यातील कार्यालयात दिसत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने कर्तव्यावर असताना गळ्यात दर्शनी भागावर ओळखपत्र घालणे बंधनकारक असतानाही अनेक कर्मचारी व अधिकारी गळ्यात ओळखपत्र घालत नाही. ओळखपत्र न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना कसे ओळखायचे? हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. ओळखपत्र घालणे बंधनकारक असून सुद्या कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या गळ्यात आयकार्ड दिसत नाही ओळखपत्रासाठी कर्मचाऱ्यांना जाब विचारले तर उडवा उडवीचे उत्तर दिले जातात. ओळखपत्र घालूनच प्रत्येक कर्मचाऱ्याने कर्तव्यावर उपस्थित असणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र घालणे हा कार्यालयीन शिस्तीचा भाग आहे. मात्र,ओळखपत्र घातले जात नसल्याने कार्यालयाची शिस्त आणि नियम पायदळी तुडवले जातांनाचे चित्र खामगाव तालुक्यात दिसत आहे.दर्शनी भागावर ओळखपत्र घालणे आवश्यक आहे. याबाबत शासनाचे परिपत्रक आहे.वरिष्ट अधिकारी परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देतील का असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
